गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

स्वयंभू - डॉ. पद्माकर विष्णु वर्तक

 प्रथमावृत्ती : १९७१, सहावी आवृत्ती : २००९ 


भीम या एका स्वयंभू पांडवावर सुमारे ५० वर्षांपूर्वी डॉ. प. वि. वर्तक यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे केवळ भीमावरील हे पहिले (व कदाचित एकमेव)  पुस्तक असावे. १९७१ साली लिहिलेल्या या पुस्तकात त्यांनी १९८८ साली तिसरी आवृत्ती काढताना एक महत्वाची भर घातली ती म्हणजे महाभारत युद्धाचा कालखंड ठरविण्याची. महाभारतातील विविध पर्वांत आलेल्या खगोलशास्त्रीय श्लोकांचा आधार घेत त्यांनी महाभारत युद्ध इ. स. पूर्व ५५६१ साली झाले असे प्रतिपादिले आणि एका वेगळ्या चर्चेला देखील तोंड फोडले. त्यांचे हेच वर्ष प्रमाण मानत  डॉ. निलेश ओक यांनी पुढे त्याचा वेगळा अभ्यास केला व स्वतःचे वेगळे संदर्भ देत १६ ऑक्टो. ५५६१ हि युद्धाच्या पहिल्या दिवसाची तारीख असल्याचे जाहीर केले. 


भीम स्वयंभूच होता हे प्रतिपादताना श्री वर्तक यांनी भीमाची पुराणकथाकारानी व कीर्तनकारांनी रंगविलेली आडदांड , खादाड, अविचारी,शीघ्रकोपी, व पटकन भावनाविवश होऊन निर्णय घेणारा पांडव, अशी प्रतिमा कशी चुकीची आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी भीमाबद्दलची महाभारतातील प्रतिमा २ भागांमध्ये विभागली आहे. पहिला भाग हा भीम हा एक उपेक्षित पण विद्वान मुत्सद्दी असल्याचे पटविणारा तर दुसरा भाग भीम कसा मूर्तिमंत पराक्रमाचे प्रतीक होता हे दर्शविणारा. आणि या दोन्ही प्रकारातून त्याच्या अजोड बुद्धिमत्तेने आणि अतुलनीय पराक्रमामुळे भीम महाभारताचा नायक कसा ठरतो हे वाचकांना पटविण्यात श्री प वि वर्तक यशस्वी झाले आहेत. 


पांडवांच्या बालपणापासूनच्या विविध प्रसंगातील भीमाच्या मुत्सद्दीपणाची बरीच उदाहरणे वर्तकांनी घेतली आहेत. लाक्षागृह प्रसंगातील त्याची सावधानता, त्यातून बाहेर पडल्यावर एकट्या भीमाने चौकसपणे आपल्या मातेचा व भावंडांचा केलेला सांभाळ, हिडिंब वध , द्रौपदी स्वयंवराच्या वेळी त्याने केलेली अर्जुनाची पाठराखण,पुढे जरासंधवध, राजसूय यज्ञातील दिग्विजय प्रसंगी भीमाचा पराक्रम इ अनेक घटनाक्रमातून भीमाची चौकसता व पराक्रम सिद्ध होतोच पण द्रौपदी वस्रहरणाच्या प्रसंगात द्रौपदीची लाज कुणामुळे राखली गेलू असेल तर ती दूरस्थ कृष्णामुळे नसून राजसभेत दास म्हणून उभ्या असलेल्या पण संतप्त झालेल्या भीममुळेच. या घटनेचे साद्यन्त वर्णन करताना द्रौपदी वस्रहरणाचा प्रसंग प्रत्यक्ष घडलाच नसल्याचे भांडारकर प्रतीतील सुमारे ३० प्रसंगातून कसे समजते हे वाचकांच्या लक्षात आणून दिले आहे. 


धर्माच्या स्वरूपावर देखील भीमानेच वेळोवेळी युधिष्ठिराशी वाद घातला आहे. सभापर्वात, द्युतामुळे आपल्यावर ओढविलेल्या प्रसंगामुळे, भीम वनपर्वात युधिष्ठिराला दोष देतानाही दिसतो. जो धर्म सुहृदांच्या आणि आपल्या अपकर्षास कारण ठरतो तो म्हणजे दुःखाचे अथवा अधर्माचेच बीज आहे याची जाणीव युधिष्ठिराला करून देताना तो महान तत्ववेत्ताच वाटतो. पण याच वनवासात भीम प्रगल्भही होत गेला आहे. दुर्योधनासारखा आपला शत्रू आपल्याकडून द्युतात हिसकावून आपल्या संपत्तीवर स्वतःचे राज्य व प्रभाव वाढवितो आहे याची त्याला जाणीव आहे. 


वनात पांडवांवर येणाऱ्या संकटाचे निराकरण प्रसंगी भीमाने एकट्याने केले आहे. किर्मीर व जटासुराचा वध हि त्याचीच उदाहरणे. द्रौपदीला पळवून नेऊ इच्छिणाऱ्या जयद्रथाला शासन भीममुळेच सहजशक्य झाले. वनवासात द्रौपदीची सर्वात जास्त काळजी कोणी वाहिली असेल तर ती भीमानेच. तिचे सगळे हट्ट देखील त्यानेच पुरविले आहेत. पुढे अज्ञातवासात असताना प्रथम किचक व नंतर अनुकिचकांच्या तावडीतून द्रौपदीला सोडविले ते देखील भीमानेच. 


असा वैयक्तिक पराक्रम करणारा भीम युद्धभूमीवरील पराक्रमी सेनानी म्हणून झळाळून उठतो. राजसूय यज्ञाकरिता जेव्हा दिग्विजयाची वेळ आली तेव्हा जरासंधाच्या वधानंतर त्याने पूर्व दिशेकडील राजे पादाक्रांत केले. यात अंगदेशाचा तत्कालीन राजा कर्ण देखील होता. कर्णाचा असाच पराभव त्याने महाभारत युद्धात देखील केलेला आढळतो. या महाभारत युद्धात दुर्योधनाचे सर्व बंधू देखील भीमानेच मारले. पण यातील विकर्णाला मारल्यावर मात्र तो हळवा  झाला कारण याच विकर्णाने भरसभेत द्रौपदीचा अपमान होत असताना त्याविरुद्ध बोलण्याचे धाडस केले होते. दुःशासनाला मारताना मात्र त्याने आपले क्रौर्य पुरेपूर प्रकट केले. भीमाच्या या युद्धातील पराक्रमाची वेगवेगळ्या युद्ध पर्वात येणारी वर्णने श्री वर्तकांनी वेचून शब्दबद्ध केली आहेत. 


महाभारत युद्धाचा कालखंड : 


पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीत जोडलेल्या भागात श्री. प. वि. वर्तक यांनी महाभारत युद्धाच्या संभाव्य कालखंडाचा विस्तृत आढावा घेतला आहे. यात विविध पुराणात उपलब्ध असलेल्या राजवंशांच्या वंशावळीपासून महाभारतात उपलब्ध असलेल्या महत्वाच्या खगोल निरीक्षणात्मक श्लोकांचे विवेचन आहे. सुप्रसिद्ध अरुंधती वसिष्ठ प्रमेयाला यात श्री वर्तकांनी पहिल्यांदा ओझरता स्पर्श केल्याचे आपल्याला आढळते. रोहिणी शकटभेद, विविध ग्रहांचे वक्री होण्याचे संदर्भ, तैत्तिरीय ब्राह्मणातील काल , वेदकाल , उत्खनन शास्त्र, या साऱ्यांचा आढावा घेत त्यांनी इ.स. पूर्व ५५६१ हे वर्ष सुचविले आहे. त्यामुळे या कालगणनेत रस असणाऱ्या वाचकांनी या पुस्तकातील हि तोंडओळख तरी नक्की वाचायला हवी. अलीकडच्या काळात यावर बरेच संशोधन होऊन वेगवेगळे कालखंड पुढे केले गेले आहेत व यातदेखील श्री वर्तकांचे हे कार्य निश्चितच पायाभूत ठरणारे आहे यात शंकाच नाही. 


शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

महाभारतातील स्त्रिया भाग - १ - डॉ. आ. ह. साळुंखे

 प्रकाशक - सुगावा प्रकाशन, पुणे ३० .....  प्रथमावृत्ती - १९९३, चौथी आवृत्ती - २००६


महाभारत कथेत स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना महाभारताचे कथानक घडते त्याच्या अनेक कारणांपैकी  एक मुळी द्रौपदीच्या अपमानाचा सूड हे आहे. पण त्याच बरोबर या स्त्रियांना स्वतःचे तेज , ठोस विचारसरणी , ओजस्विता आहे, व त्यामुळे महाभारतातील काही स्त्रियांची रेखाटने उठून दिसतात. 


महाभारतातील उपाख्यानांमध्येही काही जनमानसात रूढ झालेल्या तर काही तुलनेने अप्रसिद्ध कथानकांद्वारे आपल्याला विविध स्त्रियांची ओळख होते. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी “महाभारतातील स्त्रिया - भाग १” या पुस्तकातून यातील काही निवडक स्त्रियांची ओळख आपल्याला करून दिली आहे. पण हि ओळख केवळ त्या स्त्रीच्या स्वभावाची अथवा महाभारतातील स्त्रीच्या संदर्भातील नसून तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब या शब्दचित्रामधून रेखाटले आहे.  महाभारतात येणारी एखादी कथा काय आशय दर्शविते व त्यातून स्त्री चे अथवा समाजमनाचे कोणते रूप आपण लक्षात घ्यावे याचे उत्तम विश्लेषण डॉ साळुंखे करतात. 


प्रास्ताविकात तुलसीविवाह प्रथा जालंधर या असुराची पत्नी वृंदा एक श्रेष्ठ पतिव्रता होती. जालंधरच्या वधासाठी विष्णूला प्रथम वृंदेच्या पातिव्रत्यभंग करणे आवश्यक ठरते यासाठी तो जालंधराचे रूप घेऊन वृंदेला फसवितो. मग वृंदा - विष्णू हि तुलसीविवाहाची प्रथा कशी चुकीची आहे हे डॉ साळुंखे आपल्याला पटवून देतात व यातूनच आपल्याला या पुस्तकात काय वाचायला मिळेल याची चुणूक दिसते. यात पुढे मग आपल्याला सावित्री, माधवी, शकुंतला, अंबा, द्रौपदी आणि भंगाश्वन राजाचे स्त्रीत्व या कथांमागील वेगळाच पैलू उलगडतो. 


सावित्रीची कथा तशी आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. वटसावित्रीच्या व्रताच्या निमित्ताने ती समाजमनावर देखील रुजविली गेली आहे. पण डॉ आ ह साळुंखे मूळ महाभारतातील उपाख्यानाचे बारकावे सांगत आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडतात. राजकन्या असलेल्या सुंदर सावित्रीचा विवाह का होत नसावा ? तिला स्वतःलाच वर संशोधनासाठी का बाहेर पडावे लागले असेल ? त्यातही तिने निवडलेला वर जंगलात वास्तव्यास असणारा परागंदा झालेल्या राजाचा राजपुत्रच का असावा ? वनात राहणाऱ्या अल्पायुषी असा शाप असणाऱ्या सत्यवानाशीच तिची लग्नगाठ अशी का बांधलेली असावी याची कारणमिमांसा या कथेतीलच काही मुद्द्यांद्वारे डॉ साळुंखे आपल्यासमोर मांडतात. सत्यवानाचे अल्पजीवीत्व का असावे ? यामधर्माकडून आपली पतीचे प्राण परत मिळविणारी सावित्री आपल्या पित्यालाही १०० पुत्र व्हावेत असा वर का बरे मागून घेत असावी याचे विवेचन डॉ साळुंखे करतात. 


यानंतर ययातिकन्या माधवीची विलक्षण कथा आहे. हट्टीपणा कसा घटक ठरू शकतो हे दुर्योधनाला पटविण्यासाठी उद्योगपर्वात (अ. १०४ ते १२१) हे उपाख्यान येते. विश्वामित्राला गुरुदक्षिणा देण्यासाठी आवश्यकी असणारे ८०० श्यामकर्णी अश्व मागण्यासाठी गालव मुनी ययाती राजाकडे येतात. पण आता आपण पूर्वीप्रमाणे श्रीमंत राहिलेलो नाही त्यामुळे इतके अश्व देऊ शकत नाही, त्या ऐवजी मी माझी कन्या माधवी तुम्हाला देतो, एखाद्या राजाला तिला देऊन तुम्ही ते ८०० अश्व प्राप्त करा असे ययाती गालवांना सांगतो. पुढे प्रत्येकी २०० अश्वांच्या मोबदल्यात ३ राजांशी या माधवीच्या १ वर्षाच्या करारावर विवाह लावत गालव मुनी ६०० अश्व प्राप्त करतात पण ठाहून जास्त अश्व न मिळाल्याने माधवीला घेऊन ते विश्वामित्रांकडे जातात. त्यावर हिला आधीच माझ्याकडे आणले असतेस तर ८०० अश्वांची आवश्यकता नव्हती असे प्रतिपादन विश्वामित्र करतात. तत्कालीन समाजव्यवस्थेतील स्त्रीच्या स्थानाचे, अवस्थेचे विवरण यावर डॉ साळुंखे करतात. 


सुप्रसिद्ध कण्वकन्या शकुंतलेची कथाही काहीशी याच धाटणीची. मात्र शंतनू राजाने आपल्या पुत्रासह आपला स्वीकार केलाच पाहिजे हे ठणकावणारी  शकुंतला डॉ साळुंखे व्यवस्थित उभी करतात व शंतनूची बाजू लंगडी पडू नये यासाठी याकरिता नंतर पुराणकारांनी महाभारतात त्याच्या शापामुळे झालेली विस्मृतीची कथा घुसविले आहे. यात मग कोळ्याला सापडलेल्या आगनाथाची कथा येते. मूळ महाभारतात मात्र या कथेला स्थान नाही. मूळ शकुंतलाच कणखर आहे. 


अंबा  व द्रौपदी या महाभारतातील मूळ कथेतील नायिका. यातले अंबेचे भीष्मांविषयक सुडाचे प्रयोजन शिखंडीला कथेत जोडण्यासाठी कसे केले गेले हे आंबा प्रकरणात डॉ साळुंखे आपल्याला समजावतात. 


द्रौपदी कथेवरही लेखक असा वेगळा प्रकाश टाकतात. ज्या अर्जुनाने तिला पणात जिंकली त्याच्याच वाट्याला ती सर्वात कमी आली. अर्जुनाला १२ वर्षे तिचा विरह सहन करावा लागला. असे असून देखील तिने अर्जुनाच्या वाजून इंटर्नशी पक्षपात केल्यामुळेच तिला सर्वप्रथम मृत्यू आला असे युधिष्ठीर म्हणतो. पांचालीचा पाचांशी विवाह हा पांडवांच्या तिच्याविषयीच्या लालसेतून झाला. पुढे तो त्यांच्या एकीसही कारणीभूत ठरला हे खरं असलं तरी त्याची वैधता पटविण्यासाठी महाभारतकारानी बऱ्याच कसरती केल्या आहेत. 


यातील शेवटची कथा विलक्षण आहे व ती आहे एकाच जन्मी प्रथम पुरुष व नंतर स्त्रीरूप पावलेल्या भंगाश्वन नावाच्या राजाची. तत्कालीन समाजाच्या मानसशास्त्र व समाजशास्त्र यांचा वेध घेणारी हि  कथा महाभारताच्या अनुशासन पर्वात येते. या कथेच्या अनुषंगाने आपल्याला महाभारतकारांच्या अचाट कल्पनाशक्तीची कल्पना येते तर याच कथेला उजेडात आणत डॉ साळुंखेंनी स्त्रीत्व कसं श्रेष्ठ याचा विचार करायला लावला आहे. 


महाभारतकालीन स्त्रीत्वाचा वेध घेणारे डॉ आ ह साळुंखे यांचे हे पहिले पुस्तक प्रत्येक जिज्ञासूने वाचायलाच हवे असे आहे.