सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

ऋग्वेदातील नासदीय सूक्त १०. १२९

 

नासदीय सूक्त १०. १२९ 


ऋग्वेदाच्या १०व्या मंडलातील १२९ सूक्त नासदीय सूक्त म्हणून ओळखले जाते कारण याची सुरुवातचाच “ना असत” या शब्दांनी होते. अवघ्या ७ ऋचांचे हे सूक्त सृष्टीनिर्मितीबद्दलचे अतिशय उत्कृष्ट सूक्त मानले जाते. या सूक्ताचा कर्ता ऋषी मात्र ज्ञात नाही. याची रचना त्रिष्टुप छंदात केलेली आहे. बुद्धी व कल्पनाशक्तीचा अतर्क्य मिलाप दाखविणारे हे सूक्त खरंच वाखाणण्याजोगे आहे. सृष्टिपूर्व प्रलयावस्था, जीवनिर्मिती, सृष्टीनिर्मितीची अगम्यता असे विविध विषय आपल्याला या लघुसूक्तात पाहायला मिळतात. सत (व्यक्त जग) व असत (अव्यक्त जग) यातील काहीच अस्तित्त्वात नसण्यापासूनच सर्व जगाच्या निर्मितीची सुरुवात होते, अशा प्रकारचे वर्णन यातील ऋचांमध्ये येते.  या सुक्तानेच अद्वैत सिद्धांताचा पाय घातला असावा. 


नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् । किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥१।।


जेव्हा असत नव्हते आणि सत देखील नव्हते, त्याठिकाणी कोणतेही लोक (सप्तलोक, सप्तपाताळ यापैकी) नव्हते , व्योम नव्हते, अशा स्थितीत हे आवरण कुणी निर्माण केलं? कुणाच्या आनंदासाठी निर्माण केलं ? आणि खळ खळ आवाज करणारे हे काय होते? हे खरंच गूढ आणि गहन आहे. 


न मृत्युरासीदमृतं न तर्हि न रात्र्या अह्न आसीत्प्रकेतः । आनीदवातं स्वधया तदेकं तस्माद्धान्यन्न परः किं चनास ॥२।।


तिथे मृत्यूही नाही आणि अमृतही नाही. रात्रही नाही आणि दिवसही नाही. आणि वाट (वायू) नसतानादेखील काही प्रक्रिया घडत आहे. तिथे कुणीही अन्य दिसत नाही. 


तम आसीत्तमसा गूळ्हमग्रेऽप्रकेतं सलिलं सर्वमा इदम् । तुच्छ्येनाभ्वपिहितं यदासीत्तपसस्तन्महिनाजायतैकम् ॥३।।

आता या अंधारात काही दिसू लागलं आहे. प्रथम तम् रूप आणि आकार नसलेले निराकार गतिमान जलतत्त्व सर्वत्र भरून राहिले.. काही तुच्छ (लहान) काही तेजस्वी असे काही. ते तपाने एका बीजरुपात अवतीर्ण झाले. 


कामस्तदग्रे समवर्तताधि मनसो रेतः प्रथमं यदासीत् । सतो बन्धुमसति निरविन्दन्हृदि प्रतीष्या कवयो मनीषा ॥४।।

ज्यांना वाढण्याची इच्छा होती ते मोठे झाले. यातून निर्मितीची इच्छा तयार झाली. व दोन ज्ञानी माहात्म्यांमधे अस्तित्त्वाची बंधुभावाची बीजे रोवली गेली, इच्छा तयार झाली.  


तिरश्चीनो विततो रश्मिरेषामधः स्विदासी३दुपरि स्विदासी३त् । रेतोधा आसन्महिमान आसन्त्स्वधा अवस्तात्प्रयतिः परस्तात् ॥५।।


त्यांच्या तिरप्या किरणांच्या मोजमापांतून खाली वर अशी दिशांची निर्मिती झाली. ज्याला महान व्हायचे होते त्याने स्वतः हून या प्रक्रियेला सुरुवात केली. 


को अद्धा वेद क इह प्र वोचत्कुत आजाता कुत इयं विसृष्टिः । अर्वाग्देवा अस्य विसर्जनेनाथा को वेद यत आबभूव ॥६।।


कोण समजेल वेद? याच्याबद्दल कोण सांगेल? हि विशेष सृष्टी कुठून आली? देवसुद्धा या प्रक्रियेत नवीन आहेत. त्यांना तरी याबद्दल माहित असेल का? 


इयं विसृष्टिर्यत आबभूव यदि वा दधे यदि वा न । यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो अङ्ग वेद यदि वा न वेद ॥७।।


या सृष्टीत जे घडलेले आहे ते जाणणारा अथवा न जाणणारा अस्तित्त्वात असेल का ? तो अध्यक्ष कुठेतरी उच्च आकाशात आहे त्याला तरी हे माहित असेल का? किंवा त्यालाही हे माहीत नाही. 


अशा रीतीने नासदीय सूक्त अनेक प्रश्न निर्माण करत सृष्टी कशी निर्माण झाली असेल याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करीत, शेवटी हा प्रश्न अनुत्तरीतच ठेवते. यात या सूक्ताच्या कर्त्यांची बुद्धिझेप खरंच उत्तुंग आहे. 


ऋग्वेदातील वाक अंभ्रूणीय सूक्त १०. १२५

 

अवघ्या ८ ऋचांचे हे लघु सूक्त वाक अथवा वाणी या देवतेची संकल्पना धरून रचलेले आहे. वाक हि अंभ्रूणी या ऋषींची कन्या. म्हणून या सुक्ताला “वाक अंभ्रूणीय” म्हणून देखील ओळखले जाते. अंभ्रूणी हे ऋषी या सूक्ताचे कर्ते आहेत. 

वाणीचा प्रभाव सर्व जगतावर कसा पडला आहे हे दर्शविणारे हे सूक्त म्हणजे वाक देवतेची आत्मस्तुती आहे. आपला प्रभाव कसा व कुठे पडतो याचे वर्णन वाक देवता या सुक्ताद्वारे करते. 


अहं रुद्रेभिर्वसुभिश्चराम्यहमादित्यैरुत विश्वदेवैः । अहं मित्रावरुणोभा बिभर्म्यहमिन्द्राग्नी अहमश्विनोभा ॥१।।


मीच रुद्र (१२) व वसू (८) , विश्वदेव  यांच्या समूहाबरोबर आहे. मी आदित्य (१२), वरून, अग्नी, इंद्र, अश्विन (२) यांच्या सोबत चालते. 


अहं सोममाहनसं बिभर्म्यहं त्वष्टारमुत पूषणं भगम् । अहं दधामि द्रविणं हविष्मते सुप्राव्ये यजमानाय सुन्वते ॥२।।


आवेशाचा दणदणाट उडवून देणारा सोम मीच धारण करते म्हणजे, माझ्याच सांगण्यावरून सोम बनविला जातो. त्थाष्टि, पुषण , भग यांना मीच साहाय्य करते. माझ्याच सांगण्यावरून हवि  दिला जातो (म्हणजे हवि  देण्यासाठी लागणाऱ्या मंत्रांचे उच्चरण माझ्याच मुळे होते). 


अहं राष्ट्री संगमनी वसूनां चिकितुषी प्रथमा यज्ञियानाम् । तां मा देवा व्यदधुः पुरुत्रा भूरिस्थात्रां भूर्यावेशयन्तीम् ॥३।।


राष्ट्राला संपत्ती देणारी, समृद्ध करणारी व पर्यायाने राष्ट्रनिर्मिती करणारी  मीच आहे. यज्ञाचा प्रथम हवि देखील मलाच दिला जातो.  म्हणूनच देवांनी मला वेगवेगळ्या वेळी विविध नावानी वर्णन केले कारण मी असंख्य ठिकाणी असंख्य रूपात वास करणारी आहे. 


मया सो अन्नमत्ति यो विपश्यति यः प्राणिति य ईं शृणोत्युक्तम् । अमन्तवो मां त उप क्षियन्ति श्रुधि श्रुत श्रद्धिवं ते वदामि ॥४।।


जो अन्न खातो, पाहतो, श्वास घेतो, ऐकतो ते सर्व माझ्या शक्तीनेच करतो. (जो वाणीचा आधार घेतो त्याला ते ते मिळते). हे सर्व मी श्रद्धावानालाच सांगते. जे माझे ऐकत नाहीत त्यांचा क्षय होतो. 


अहमेव स्वयमिदं वदामि जुष्टं देवेभिरुत मानुषेभिः । यं कामये तंतमुग्रं कृणोमि तं ब्रह्माणं तमृषिं तं सुमेधाम् ॥५।।


मी देवांमध्येही आहे व मनुष्यांमध्येही. ज्याला ज्याची इच्छा आहे ते मी करते. आणि हे मी चांगल्या बुद्धीच्या (सुमेधस) लोकांसाठीच करते.  


अहं रुद्राय धनुरा तनोमि ब्रह्मद्विषे शरवे हन्तवा उ । अहं जनाय समदं कृणोम्यहं द्यावापृथिवी आ विवेश ॥६।।

मीच रुद्राचे धनुष्य ताणते म्हणजे ब्रम्हाचा द्वेष करणाऱ्याचा नाश होतो. मी सर्व युद्धजन्य जनांना सारखेच ठेवते. मी पृथ्वीपासून आकाशापर्यंत आहे. 


अहं सुवे पितरमस्य मूर्धन्मम योनिरप्स्वन्तः समुद्रे । ततो वि तिष्ठे भुवनानु विश्वोतामूं द्यां वर्ष्मणोप स्पृशामि ॥७।।


माझे पैतृक मी पृथीवर आणले आहे. मी समुद्राच्या पाण्यातून वर आले आहे आणि तेथून या सर्व जगतात पसरले आहे. 


अहं सुवे पितरमस्य मूर्धन्मम योनिरप्स्वन्तः समुद्रे । ततो वि तिष्ठे भुवनानु विश्वोतामूं द्यां वर्ष्मणोप स्पृशामि ॥८।।


मी वायू आहे त्यामुळे विश्वाला वाणीचे अस्तित्त्व समजेल मी अशीच भुवने निर्माण करीत जाते. पूर्वी या आधीही माझ्याकडून पृथ्वीचे निर्माण झाले आहे. 


ऋग्वेदातील पुरुष सूक्त (१०.९०)

 पुरुष सूक्त हे ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील ९० वे सूक्त आहे. यात १६ ऋचांमध्ये विराट पुरुषाचे व पृथ्वीवरील जीवोत्पत्तीचे वर्णन आहे. यातील सुरुवातीच्या ५ ऋचा विराट पुरुषाच्या वर्णनाच्या आहेत तर उरलेल्या ११ ऋचांमध्ये विश्वनिर्मितीची प्रक्रिया कशी साकारत गेली असावी याचे वर्णन आहे. या सूक्ताचा कर्ता ऋषी “नारायण” असून देवता “पुरुष” आहे. 


स॒हस्र॑शीर्षा॒ पुरु॑षः सहस्रा॒क्षः स॒हस्र॑पात् । स भूमिं॑ वि॒श्वतो॑ वृ॒त्वात्य॑तिष्ठद्दशाङ्गु॒लम् ॥१।।


या पहिल्या मंत्रामधून आपल्याला एका सहस्त्र शीर्ष असलेल्या विराट पुरुषाचे वर्णन मिळते. यातील सहस्त्र हा शब्द “असंख्य”, “अनंत”, ”विराट” अशा अर्थाने येतो कारण या पुरुषाला  जशी सहस्त्र शीर्षे आहेत तसेच त्याला सहस्त्र अक्ष (डोळे) व सहस्त्र पाद देखील आहेत. तो एवढा विशाल आहे कि सर्व जगताला व्यापल्यानंतरही दशांगुळे उरला आहे. 


पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् । उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति ॥२


हा जो विराट पुरुष आहे तो सर्व सृष्टीचा स्वामी आहे. जे पूर्वी होऊन गेले अथवा जे पुढे घडायचे आहे त्याचाही स्वामी हाच आहे. अमृत व जरा मृत्यूरहीत स्थितीचा स्वामी देखील तोच व जे अन्न प्राशन करून वाढतात त्या प्राण्यांचा  स्वामी हाच आहे. 


एतावानस्य महिमातो ज्यायाँश्च पूरुषः । पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि ॥३।।


एवढा मोठा महिमा असलेला हा पुरुष एवढा विराट आहे कि हे भूत विश्व त्याच्या  केवळ एक चतुर्थांश  भागात सामावलेले आहे तर त्याचे इतर ३ भाग अंतराळात आहेत.  म्हणजेच ते एवढे विशाल आहेत कि आपल्याला त्याचा थांग लागू शकत नाही. 


त्रिपादूर्ध्व उदैत्पुरुषः पादोऽस्येहाभवत्पुनः । ततो विष्वङ्व्यक्रामत्साशनानशने अभि ॥४।।


असा हा तीन ऊर्ध्व पद अंतराळात असलेला पुरुष अवतीर्ण झाला. त्याचा हा ४ था पदांश प्रलय व निर्मिती या सृष्टिनिर्मिती प्रक्रियेतून जात असतो. साशन (अन्नामुळे चेतन असलेले ) व अनशन (अन्न नसल्याने अचेतन असलेले )  असे दोन्ही पदार्थ त्याने व्यापून टाकले. 


तस्माद्विराळजायत विराजो अधि पूरुषः । स जातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः ॥५।।


यातूनच “विराट” पुरुष उत्पन्न झाला. पण परमात्मस्वरूप पुरुष त्याहीपेक्षा वर होता. विराट पुरुषाने त्यापुढे जात, भूमी व पुरे (शरीरे) निर्माण केली. 


यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत । वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरद्धविः ॥६।।


जेव्हा या विराट पुरुषाला यज्ञार्पणाचा  हवि योजला तेव्हा वसंत ऋतू त्याचा आज्य (घृत) बनला, ग्रीष्म ऋतू इंधन (समिधा) व शरद ऋतू हवि  (आहुती) झाला. 


तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः । तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये ॥७।।


या मानस यज्ञातून जो सर्वांच्या पूर्वी उत्पन्न झाला, त्यावर प्रोक्षण (सिंचन ) आणि या हवनयोग्य पुरुषाच्या योगाने देवांनी आणि “साध्य” (नावाच्या) ऋषींनी त्याचे यजन केले. 


तस्माद्यज्ञात्सर्वहुतः सम्भृतं पृषदाज्यम् । पशून्ताँश्चक्रे वायव्यानारण्यान्ग्राम्याश्च ये ॥८।।


सर्व प्रकारची आहुती दिलेल्या त्या यज्ञापासून पृषत (दही) व आज्यम (घृत) जमा झाले. व त्यानंतर पशु, हवेतील पक्षी, अरण्यातील प्राणी, ग्रामपशू आदी निर्माण झाले.  


तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे । छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत ॥९।।


सर्व प्रकारची आहुती दिलेल्या त्या यज्ञापासून ऋचा, सामवेदाचे  मंत्र निर्माण झाले तसेच छंद व यजुर्वेदाचा उदय झाला. 


तस्मादश्वा अजायन्त ये के चोभयादतः । गावो ह जज्ञिरे तस्मात्तस्माज्जाता अजावयः ॥१०।।


त्यातूनच अश्व निर्माण झाले. ज्यांना वरचे व खालचे असे दोन प्रकारचे दात (अथवा जबडा) असतो असे पशु उत्पन्न झाले. त्यातूनच गायी, शेळ्या, मेंढ्या, बोकड (अज ) निर्माण झाले. 


यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन् । मुखं किमस्य कौ बाहू का ऊरू पादा उच्येते ॥११।।


जेव्हा या पुरुषासाठी अवयवांची योजना केली तेव्हा कोणते अवयव कल्पिले? त्याचे मुख, बाहू, मांड्या, पाय कोणते ठरविण्यात आले. 


ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहू राजन्यः कृतः । ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत ॥१२।।


तर ब्राम्हण हे मुख, राज्यकर्ते क्षत्रिय त्याचे बाहू, वैश्य त्याच्या मांड्या व शूद्र त्याचे पाय अशी योजना करण्यात आली. 

(येथे चार वर्णांचा उल्लेख एकदाच ऋग्वेदात येतो). 


चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत । मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत ॥१३।।


त्याच्या मनापासून चंद्र, दोन्ही नेत्रांच्या तेजापासून सूर्य, मुखापासून इंद्र व अग्नी आणि त्याच्या श्वासातून वायूची निर्मिती झाली. 


नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णो द्यौः समवर्तत । पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा लोकाँ अकल्पयन् ॥१४।।


त्याच्या नाभीपासून अंतरिक्ष, मस्तकापासून द्युलोक निर्माण झाला. त्याच्या पायांपासून भूमी, कानांपासून दिशा आणि इतर लोक उत्पन्न झाले. अशा प्रकारे संपूर्ण जगताची उत्पत्ती झाली. 


सप्तास्यासन्परिधयस्त्रिः सप्त समिधः कृताः । देवा यद्यज्ञं तन्वाना अबध्नन्पुरुषं पशुम् ॥१५।।


या यज्ञाच्या सात परिधी (यज्ञवेदीच्या पायऱ्या) व त्रिसप्त (२१) समिधा केल्या होत्या. आणि देवांनी यज्ञाला प्रारंभ करून या यज्ञवेदीजवळ (यूपाला ) यज्ञ पशु म्हणून या विराट पुरुषाला बांधले. 


यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॥१६।।


अशा रीतीने यज्ञ योग्य पुरुषाद्वारे देवांनी यज्ञाद्वारे यजन केले आणि त्यातून निर्माण झालेल्या धर्माची प्रथम स्थापना केली व यज्ञमार्ग चालू केला, जेणेकरून स्वर्गाची प्राप्ती झाली. 


१६ ऋचांचे हे सूक्त परमेश्वराच्या विराट रूपाचे वर्णन करते तसेच ते सृष्टिनिर्मितीची वेदकालीन मानली जाणारी प्रक्रियादेखील उद्धृत करते. सृष्टिनिर्मितीचे कोडे सोडविण्याचा प्रयत्न करणारी जी काही सूक्ते वेद वाङ्मयात आहेत त्यामधील हा देखील एक प्रयत्न आहे. सांख्यांचे तत्त्वज्ञान देखील याच पायावर उभे आहे. तत्कालीन ज्ञात असलेल्या ज्ञानातून परम ईश सामंजवून घेण्याचा तसेच सृष्टीचे कोडे उलगडण्याचा हा एक प्रयत्न आहे. पंचमहाभूतांची निर्मिती कशी झाली असावी ? प्राणी कसे निर्माण झाले असावेत, वेद कसे निर्माण झाले असावेत ? सूर्य - चंद्र - श्वासासाठी आवश्यक असलेला वायू यांची निर्मिती कशी झाली आणि धर्माचा पाया घालून स्वर्गाचा मार्ग कसा प्रशस्त केला गेला असेल याची कल्पना या सूक्तांतून येते.