रविवार, २ जुलै, २०२३

महाभारतातील व्यक्तिरेखा - डॉ विमल पवनीकर

 विजय प्रकाशन, प्रथमावृत्ती - १६ जून २००५, दुसरी सुधारित आवृत्ती - २१ ऑक्टोबर २०१४.  किंमत - रु ५००/-


महाभारतातील विविध व्यक्तिरेखांवर आजवर बरेच व्यक्तिचित्रण केले गेले आहे. व्यासांच्या लेखणीतून उतरलेल्या या महाकाव्यातील या व्यक्तिरेखांना इतक्या छटा आहेत कि यातील प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव विशेष, गुवणत्ता व पराक्रम दाखविणारी स्वतंत्र पुस्तके देखील उपलब्ध आहेत. “महाभारतातील व्यक्तिरेखा” हे डॉ विमल पवनीकरांचे पुस्तक म्हणजे यातील १७ व्यक्तिरेखांचे वर्णन करणारे, नागपूरच्या तरुण भारत मध्ये ९० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन आहे. त्यामुळे यातील प्रत्येक व्यक्तिरेखेवरचे लेख वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमध्ये विभागले गेलेले आहेत. उदा. कर्ण हि व्यक्तिरेखा वैकर्तन कर्ण, सूतपुत्र कर्ण, शापग्रस्त कर्ण , अधःपतित कर्ण, पराजित कर्ण, अनिर्वचनीय कर्ण व रणवीर कर्ण अश्या विविधांगाने आपल्यासमोर येतो व याचप्रमाणे इतर व्यक्तिरेखादेखील. 


महाभारतातील व्यक्तिरेखांचे वर्णन आपल्याला त्यांच्याविषयी महाभारतात विविध ठिकाणी आलेल्या प्रसंगावरून वाचायला मिळते. त्या त्या प्रसंगात त्या व्यक्तिरेखेचे विशेष पैलू उभारून येतात व लेखिका त्यावेळच्या समर्पक श्लोकांमधून आपल्याला ते पैलू  विषद करीत राहतात. श्लोक व त्याचा अर्थ, त्यावरील विवेचन यातून गुंफली जाणारी व्यक्तिरेखांची ही मालिका आपल्याला महाभारताचे वेगळेच गुणविशेष उलगडते. मात्र हे पुस्तक वाचण्यापूर्वी आपल्याला महाभारताच्या कथानकाची चांगली ओळख असणे आवश्यक आहे तरच यातील बारकावे आपल्याला उलगडतील. 


पुस्तकाच्या अखेरीस व्यासांच्या महाभारताने भारतीय परंपरेत जे मोलाचे कार्य करून ठेवले आहे त्याचा आढावा घेतलेला आहे. यात कालिदासाच्या रघुवंश, कुमारसंभव, अभिज्ञान शाकुन्तलम, विक्रमोर्वीरशियम (पुरुरवा व उर्वशीची कथा) इत्यादीतून महाभारताचे झालेले बीजारोपण, भट्टनारायणाचे वेणीसंहार, भासाचे ऊरूभंग, दूतवाक्यम, पंचरात्रम, दूतघटोत्कच, बालचरितम, कर्णभार यातून फुललेला कथाफुलोरा कसा महाभारतातूनच फुलला याचा उहापोह आहे. यातूनच भारवीने किरातार्जुनीयम, माघाने शिशुपालवध, श्रीहर्षाने नैषधीय चरितम यांसारखी संस्कृत महाकाव्य रचली याचाही उल्लेख येतो. प्रत्येक कवीने, कथाकाराने या महाकाव्यात काय शोधले? महाभारत आपल्या परंपरेत व जीवनशैलीत कसे मिसळून गेले याचाही आढावा आपल्याला यातून घेतलेला आढळतो. 


महाभारत सलग वाचताना आपल्याला या व्यक्तिरेखांचे गुणविशेष सलगपणे आपल्याला जाणवत नाहीत पण या पुस्तकातून ते कळल्याने आपण स्तिमित होऊन जातो. त्यामुळेच महाभारताबद्दल जिज्ञासा असणाऱ्यांनी हे पुस्तक एकदातरी वाचायला हवे.