रविवार, २ जुलै, २०२३

महाभारतातील व्यक्तिरेखा - डॉ विमल पवनीकर

 विजय प्रकाशन, प्रथमावृत्ती - १६ जून २००५, दुसरी सुधारित आवृत्ती - २१ ऑक्टोबर २०१४.  किंमत - रु ५००/-


महाभारतातील विविध व्यक्तिरेखांवर आजवर बरेच व्यक्तिचित्रण केले गेले आहे. व्यासांच्या लेखणीतून उतरलेल्या या महाकाव्यातील या व्यक्तिरेखांना इतक्या छटा आहेत कि यातील प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव विशेष, गुवणत्ता व पराक्रम दाखविणारी स्वतंत्र पुस्तके देखील उपलब्ध आहेत. “महाभारतातील व्यक्तिरेखा” हे डॉ विमल पवनीकरांचे पुस्तक म्हणजे यातील १७ व्यक्तिरेखांचे वर्णन करणारे, नागपूरच्या तरुण भारत मध्ये ९० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन आहे. त्यामुळे यातील प्रत्येक व्यक्तिरेखेवरचे लेख वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमध्ये विभागले गेलेले आहेत. उदा. कर्ण हि व्यक्तिरेखा वैकर्तन कर्ण, सूतपुत्र कर्ण, शापग्रस्त कर्ण , अधःपतित कर्ण, पराजित कर्ण, अनिर्वचनीय कर्ण व रणवीर कर्ण अश्या विविधांगाने आपल्यासमोर येतो व याचप्रमाणे इतर व्यक्तिरेखादेखील. 


महाभारतातील व्यक्तिरेखांचे वर्णन आपल्याला त्यांच्याविषयी महाभारतात विविध ठिकाणी आलेल्या प्रसंगावरून वाचायला मिळते. त्या त्या प्रसंगात त्या व्यक्तिरेखेचे विशेष पैलू उभारून येतात व लेखिका त्यावेळच्या समर्पक श्लोकांमधून आपल्याला ते पैलू  विषद करीत राहतात. श्लोक व त्याचा अर्थ, त्यावरील विवेचन यातून गुंफली जाणारी व्यक्तिरेखांची ही मालिका आपल्याला महाभारताचे वेगळेच गुणविशेष उलगडते. मात्र हे पुस्तक वाचण्यापूर्वी आपल्याला महाभारताच्या कथानकाची चांगली ओळख असणे आवश्यक आहे तरच यातील बारकावे आपल्याला उलगडतील. 


पुस्तकाच्या अखेरीस व्यासांच्या महाभारताने भारतीय परंपरेत जे मोलाचे कार्य करून ठेवले आहे त्याचा आढावा घेतलेला आहे. यात कालिदासाच्या रघुवंश, कुमारसंभव, अभिज्ञान शाकुन्तलम, विक्रमोर्वीरशियम (पुरुरवा व उर्वशीची कथा) इत्यादीतून महाभारताचे झालेले बीजारोपण, भट्टनारायणाचे वेणीसंहार, भासाचे ऊरूभंग, दूतवाक्यम, पंचरात्रम, दूतघटोत्कच, बालचरितम, कर्णभार यातून फुललेला कथाफुलोरा कसा महाभारतातूनच फुलला याचा उहापोह आहे. यातूनच भारवीने किरातार्जुनीयम, माघाने शिशुपालवध, श्रीहर्षाने नैषधीय चरितम यांसारखी संस्कृत महाकाव्य रचली याचाही उल्लेख येतो. प्रत्येक कवीने, कथाकाराने या महाकाव्यात काय शोधले? महाभारत आपल्या परंपरेत व जीवनशैलीत कसे मिसळून गेले याचाही आढावा आपल्याला यातून घेतलेला आढळतो. 


महाभारत सलग वाचताना आपल्याला या व्यक्तिरेखांचे गुणविशेष सलगपणे आपल्याला जाणवत नाहीत पण या पुस्तकातून ते कळल्याने आपण स्तिमित होऊन जातो. त्यामुळेच महाभारताबद्दल जिज्ञासा असणाऱ्यांनी हे पुस्तक एकदातरी वाचायला हवे. 



गुरुवार, २१ जुलै, २०२२

कृष्णाख्यान - महेश नाईक

भारतीय मनावर श्रीकृष्ण या नावाची मोहिनी गेली किमान पाच सहस्रके कायम आहे. प्रत्येकाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असला तरी या सर्वांचे भारावलेपण हा त्यातील सामायिक दुवा आहे. कुणी त्याची भक्ती करते, तर कुणी त्यात राजकारणधुरंधर व्यक्तिमत्त्व शोधते. त्याच्या कार्याचा आवाका, त्याची निर्णयक्षमता इतकी विलक्षण आहे की, आपण चकित झाल्याशिवाय रहात नाही. आणि मग आज पाच हजार वर्षांनंतर जर आपली ही परिस्थिती असेल तर ज्या काळात तो जगला तो व त्याच्यानंतर लगतचा काळ यात तो दंतकथा बनून राहिला नसता तरच नवल.

त्याच्या कार्यकर्तृत्वावर चमत्कारांची आवरणे चढत गेली. वास्तविक पाहता त्याच्या कार्याला यातील कोणत्याही आवरणाची आवश्यकता नाही असे त्याचे कर्तृत्व निर्विवाद होते. भौतिक नियमांच्या चौकटीतच राहून त्याने त्याची अचाट कार्ये केली अन् त्याच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो भक्तगणांनी त्याला ‘भगवंत बनविण्यासाठी’ ही भौतिक नियमांची आणि तर्कवादाची चौकट मोडून टाकली आणि त्याच्याकडून त्याने कदाचित कधीही न केलेली अचाट कामेदेखील करून घेतली!
कृष्णाख्यान कशासाठी ?
- कृष्णाचे मानवी रूप समजून घेण्यासाठी.
- चमत्कार विरहीत कृष्ण समजून घेण्यासाठी, कृष्ण चरित्रातील चमत्कारांची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी.
- मानवी पातळीवर महाभारत कसे घडले असेल हे कृष्ण-चरित्राद्वारे समजावून घेण्यासाठी.
- कृष्ण किती वर्षे जगाला? त्याच्या आयुष्यातील कोणत्या घटना त्याच्या वयाच्या कोणत्या वर्षी घडल्या? या प्रश्नांची उत्तरे सप्रमाण मिळविण्यासाठी.
- कृष्णाचे संपूर्ण चरित्र समजून घेण्यासाठी.
गेल्या पन्नास-साठ वर्षात अनेक नामवंतांनी कृष्णाचे हे भौतिक नियमांच्या चौकटीतील रूप मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे वाचताना मला यात पूर्णत्व आणण्यासाठी एका सलग, तरीपण संक्षिप्त कृष्ण-चरित्राची निकड भासू लागली. आणि म्हणूनच विविध ठिकाणी वाचलेल्या बारीकसारीक घटना, त्यामागचे तर्क, विचारमंथने मी सलग मांडून शब्दबद्ध करायचा प्रयत्न केला आहे. कृष्णाचे खरेखुरे स्वरूप जाणून घ्यायची माझ्यासारखी जिज्ञासा असणाऱ्या वाचकांना माझे हे ‘कृष्णाख्यान’ नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.


गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

स्वयंभू - डॉ. पद्माकर विष्णु वर्तक

 प्रथमावृत्ती : १९७१, सहावी आवृत्ती : २००९ 


भीम या एका स्वयंभू पांडवावर सुमारे ५० वर्षांपूर्वी डॉ. प. वि. वर्तक यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे केवळ भीमावरील हे पहिले (व कदाचित एकमेव)  पुस्तक असावे. १९७१ साली लिहिलेल्या या पुस्तकात त्यांनी १९८८ साली तिसरी आवृत्ती काढताना एक महत्वाची भर घातली ती म्हणजे महाभारत युद्धाचा कालखंड ठरविण्याची. महाभारतातील विविध पर्वांत आलेल्या खगोलशास्त्रीय श्लोकांचा आधार घेत त्यांनी महाभारत युद्ध इ. स. पूर्व ५५६१ साली झाले असे प्रतिपादिले आणि एका वेगळ्या चर्चेला देखील तोंड फोडले. त्यांचे हेच वर्ष प्रमाण मानत  डॉ. निलेश ओक यांनी पुढे त्याचा वेगळा अभ्यास केला व स्वतःचे वेगळे संदर्भ देत १६ ऑक्टो. ५५६१ हि युद्धाच्या पहिल्या दिवसाची तारीख असल्याचे जाहीर केले. 


भीम स्वयंभूच होता हे प्रतिपादताना श्री वर्तक यांनी भीमाची पुराणकथाकारानी व कीर्तनकारांनी रंगविलेली आडदांड , खादाड, अविचारी,शीघ्रकोपी, व पटकन भावनाविवश होऊन निर्णय घेणारा पांडव, अशी प्रतिमा कशी चुकीची आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी भीमाबद्दलची महाभारतातील प्रतिमा २ भागांमध्ये विभागली आहे. पहिला भाग हा भीम हा एक उपेक्षित पण विद्वान मुत्सद्दी असल्याचे पटविणारा तर दुसरा भाग भीम कसा मूर्तिमंत पराक्रमाचे प्रतीक होता हे दर्शविणारा. आणि या दोन्ही प्रकारातून त्याच्या अजोड बुद्धिमत्तेने आणि अतुलनीय पराक्रमामुळे भीम महाभारताचा नायक कसा ठरतो हे वाचकांना पटविण्यात श्री प वि वर्तक यशस्वी झाले आहेत. 


पांडवांच्या बालपणापासूनच्या विविध प्रसंगातील भीमाच्या मुत्सद्दीपणाची बरीच उदाहरणे वर्तकांनी घेतली आहेत. लाक्षागृह प्रसंगातील त्याची सावधानता, त्यातून बाहेर पडल्यावर एकट्या भीमाने चौकसपणे आपल्या मातेचा व भावंडांचा केलेला सांभाळ, हिडिंब वध , द्रौपदी स्वयंवराच्या वेळी त्याने केलेली अर्जुनाची पाठराखण,पुढे जरासंधवध, राजसूय यज्ञातील दिग्विजय प्रसंगी भीमाचा पराक्रम इ अनेक घटनाक्रमातून भीमाची चौकसता व पराक्रम सिद्ध होतोच पण द्रौपदी वस्रहरणाच्या प्रसंगात द्रौपदीची लाज कुणामुळे राखली गेलू असेल तर ती दूरस्थ कृष्णामुळे नसून राजसभेत दास म्हणून उभ्या असलेल्या पण संतप्त झालेल्या भीममुळेच. या घटनेचे साद्यन्त वर्णन करताना द्रौपदी वस्रहरणाचा प्रसंग प्रत्यक्ष घडलाच नसल्याचे भांडारकर प्रतीतील सुमारे ३० प्रसंगातून कसे समजते हे वाचकांच्या लक्षात आणून दिले आहे. 


धर्माच्या स्वरूपावर देखील भीमानेच वेळोवेळी युधिष्ठिराशी वाद घातला आहे. सभापर्वात, द्युतामुळे आपल्यावर ओढविलेल्या प्रसंगामुळे, भीम वनपर्वात युधिष्ठिराला दोष देतानाही दिसतो. जो धर्म सुहृदांच्या आणि आपल्या अपकर्षास कारण ठरतो तो म्हणजे दुःखाचे अथवा अधर्माचेच बीज आहे याची जाणीव युधिष्ठिराला करून देताना तो महान तत्ववेत्ताच वाटतो. पण याच वनवासात भीम प्रगल्भही होत गेला आहे. दुर्योधनासारखा आपला शत्रू आपल्याकडून द्युतात हिसकावून आपल्या संपत्तीवर स्वतःचे राज्य व प्रभाव वाढवितो आहे याची त्याला जाणीव आहे. 


वनात पांडवांवर येणाऱ्या संकटाचे निराकरण प्रसंगी भीमाने एकट्याने केले आहे. किर्मीर व जटासुराचा वध हि त्याचीच उदाहरणे. द्रौपदीला पळवून नेऊ इच्छिणाऱ्या जयद्रथाला शासन भीममुळेच सहजशक्य झाले. वनवासात द्रौपदीची सर्वात जास्त काळजी कोणी वाहिली असेल तर ती भीमानेच. तिचे सगळे हट्ट देखील त्यानेच पुरविले आहेत. पुढे अज्ञातवासात असताना प्रथम किचक व नंतर अनुकिचकांच्या तावडीतून द्रौपदीला सोडविले ते देखील भीमानेच. 


असा वैयक्तिक पराक्रम करणारा भीम युद्धभूमीवरील पराक्रमी सेनानी म्हणून झळाळून उठतो. राजसूय यज्ञाकरिता जेव्हा दिग्विजयाची वेळ आली तेव्हा जरासंधाच्या वधानंतर त्याने पूर्व दिशेकडील राजे पादाक्रांत केले. यात अंगदेशाचा तत्कालीन राजा कर्ण देखील होता. कर्णाचा असाच पराभव त्याने महाभारत युद्धात देखील केलेला आढळतो. या महाभारत युद्धात दुर्योधनाचे सर्व बंधू देखील भीमानेच मारले. पण यातील विकर्णाला मारल्यावर मात्र तो हळवा  झाला कारण याच विकर्णाने भरसभेत द्रौपदीचा अपमान होत असताना त्याविरुद्ध बोलण्याचे धाडस केले होते. दुःशासनाला मारताना मात्र त्याने आपले क्रौर्य पुरेपूर प्रकट केले. भीमाच्या या युद्धातील पराक्रमाची वेगवेगळ्या युद्ध पर्वात येणारी वर्णने श्री वर्तकांनी वेचून शब्दबद्ध केली आहेत. 


महाभारत युद्धाचा कालखंड : 


पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीत जोडलेल्या भागात श्री. प. वि. वर्तक यांनी महाभारत युद्धाच्या संभाव्य कालखंडाचा विस्तृत आढावा घेतला आहे. यात विविध पुराणात उपलब्ध असलेल्या राजवंशांच्या वंशावळीपासून महाभारतात उपलब्ध असलेल्या महत्वाच्या खगोल निरीक्षणात्मक श्लोकांचे विवेचन आहे. सुप्रसिद्ध अरुंधती वसिष्ठ प्रमेयाला यात श्री वर्तकांनी पहिल्यांदा ओझरता स्पर्श केल्याचे आपल्याला आढळते. रोहिणी शकटभेद, विविध ग्रहांचे वक्री होण्याचे संदर्भ, तैत्तिरीय ब्राह्मणातील काल , वेदकाल , उत्खनन शास्त्र, या साऱ्यांचा आढावा घेत त्यांनी इ.स. पूर्व ५५६१ हे वर्ष सुचविले आहे. त्यामुळे या कालगणनेत रस असणाऱ्या वाचकांनी या पुस्तकातील हि तोंडओळख तरी नक्की वाचायला हवी. अलीकडच्या काळात यावर बरेच संशोधन होऊन वेगवेगळे कालखंड पुढे केले गेले आहेत व यातदेखील श्री वर्तकांचे हे कार्य निश्चितच पायाभूत ठरणारे आहे यात शंकाच नाही.