गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

हा जय नावाचा इतिहास आहे - आनंद साधले

 प्रथमावृत्ती - नोव्हेंबर १९६४ , चौथी आवृत्ती - ऑगस्ट २०१४

“युधिष्ठिराच्या पराभवाची गाथा” खरं तर हे या पुस्तकाचं नाव असायला हवं होतं असं हे पुस्तक वाचल्यानंतर वाटतं या पुस्तकात असं एकही पान नाही कि ज्यात  युधिष्ठीराला दूषणं दिलेली नाहीत.

पुस्तकाच्या नावावरून हे थोडक्यात वर्णिलेले महाभारत असावं असं मला वाटलं होतं.  प्रकरणांची नावे त्यांच्या संस्कृत श्लोकांची संक्षिप्त मराठी अर्थ आहे.  पण श्री आनंद साधले यांनी , वेचून वेचून युधिष्ठिराला नाव ठेवणारे श्लोक कसे निवडले असावेत?  याचं आश्चर्य वाटत राहतं.  श्रीकृष्णाचे मजबूत अधिष्ठान हे देखील या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य.  पांडवांची वैगुण्य दाखवत ती श्रीकृष्णाने कशी झाकली,  हे दाखवत साधले यांनी श्रीकृष्णाचे गुणगान  केलं आहे.  आणि प्रत्येक प्रसंगात श्रीकृष्ण नसता तर काहीच कसं  होऊ शकलं नसतं,  हे दाखवत त्यांनी अर्जुना सह सर्व पांडव कसे प्रभावहीन ठरत हे रंगविले आहे. 

आणि हे करताना धृतराष्ट्र, दुर्योधन प्रभृतींचा त्रागा कसा समर्पक होता व त्यांचाच राज्यावर कसा प्रथम अधिकार ठरत होता हेदेखील त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. यात कर्णावर वेळोवेळी झालेला अन्याय त्यांनी अधोरेखित करत कर्णाच्या पराभवांवर  व चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न देखील केला आहे. 

पण असे असले तरी १९६४ साली प्रसिद्ध झालेले त्यांचे हे पुस्तक महाभारताविषयी चा एक वेगळा व कदाचित विद्रोही दृष्टिकोण म्हणून अभ्यासायला हवे.  तसे झाले तरच  अभ्यासकांकडून त्यातील सत्याच्या खोलात जाण्याचे प्रयत्न होतील.  मात्र असे प्रयत्न न झाल्यास तो वाचक अभ्यासाच्या पातळीवर न जाता अगम्य महाभारतात हरवून जाईल. 

छोटी छोटी प्रकरणं, हे देखील या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.  लेखक यातून तो तो प्रसंग रंगवत वाचकाच्या मनावर ठसवत जातो.  ही एक चांगली लेखन पद्धत आहे पण केवळ युधिष्ठिराची वैगुण्ये दाखवण्याच्या अट्टाहासापायी  हे वैशिष्ट्य वाया गेले असे वाटत राहते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: