प्रथमावृत्ती - नोव्हेंबर १९६४ , चौथी आवृत्ती - ऑगस्ट २०१४
“युधिष्ठिराच्या पराभवाची गाथा” खरं तर हे या पुस्तकाचं नाव असायला हवं होतं असं हे पुस्तक वाचल्यानंतर वाटतं या पुस्तकात असं एकही पान नाही कि ज्यात युधिष्ठीराला दूषणं दिलेली नाहीत.
आणि हे करताना धृतराष्ट्र, दुर्योधन प्रभृतींचा त्रागा कसा समर्पक होता व त्यांचाच राज्यावर कसा प्रथम अधिकार ठरत होता हेदेखील त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. यात कर्णावर वेळोवेळी झालेला अन्याय त्यांनी अधोरेखित करत कर्णाच्या पराभवांवर व चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न देखील केला आहे.
पण असे असले तरी १९६४ साली प्रसिद्ध झालेले त्यांचे हे पुस्तक महाभारताविषयी चा एक वेगळा व कदाचित विद्रोही दृष्टिकोण म्हणून अभ्यासायला हवे. तसे झाले तरच अभ्यासकांकडून त्यातील सत्याच्या खोलात जाण्याचे प्रयत्न होतील. मात्र असे प्रयत्न न झाल्यास तो वाचक अभ्यासाच्या पातळीवर न जाता अगम्य महाभारतात हरवून जाईल.
छोटी छोटी प्रकरणं, हे देखील या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. लेखक यातून तो तो प्रसंग रंगवत वाचकाच्या मनावर ठसवत जातो. ही एक चांगली लेखन पद्धत आहे पण केवळ युधिष्ठिराची वैगुण्ये दाखवण्याच्या अट्टाहासापायी हे वैशिष्ट्य वाया गेले असे वाटत राहते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा