रविवार, १८ एप्रिल, २०२१

व्यासांचा वारसा - आनंद विनायक जातेगावकर

प्रथमावृत्ती - फेब्रुवारी २००९, तृतीय आवृत्ती - मे २०१६

व्यासांचा वारसा हे आनंद जातेगावकरांचे पुस्तक म्हणजे व्यासांचा, खरतर एक जादुई आरसाच आहे, ज्यात पाहून आपल्याला व्यास लख्खपणे दिसू लागतात.  ज्या गोष्टी महाभारतातून भांडारकर संस्थेच्या संशोधित प्रतीलाही वेगळ्या करता येऊ शकल्या नाहीत (कोणत्या ना कोणत्या तरी जुन्या हस्तलिखित प्रतींमध्ये असल्यामुळे) त्या  देखील या आरश्यात आपल्याला स्पष्टपणे ओळखता येऊ शकतात.  मात्र यासाठी हा आरसा पाहण्याचे कसब आत्मसात करणे, आपल्याला  आवश्यक आहे

जातेगावकऱ्रांचं एक निरीक्षण म्हणजे, स्वतः कथालेखक असलेले व्यास जे या कथेचा भाग आहेत, ते निर्वाणीच्या क्षणी या कथेत स्वतः हजर होतात, ते मोलाचा सल्ला देतात, सूचक बोलतात, मात्र कोणतीही भविष्यवाणी ते वर्तवित नाहीत.  ते दैववादी नाहीतच मुळी आणि यात कृष्ण सोडला,  तर इतर सर्व व्यक्तिरेखा मात्र,  दैववादाचा समर्थन करताना आढळतात व त्यातून वर, शाप, चमत्कार या संकल्पना उगम पावतात.  व्यास मात्र कोठेही यात  अडकत नाहीत.  जातेगावकर यातून हेदेखील सूचित करतात की,  या साऱ्या गोष्टी म्हणजे उत्तरकालीन भर.  व्यासांनी स्वतः कुठेही अशा प्रकारची वाक्ये टाकलेली नाहीत. 

महाभारतातील काही घटना प्रक्षेप कशा असतील हे आपल्याला जातेगावकर सुचवून जातात.  शरशय्येवर पडलेल्या भीष्मांनी,  युधिष्ठिराला केलेला उपदेश हा याच प्रकारातला.  राजाचं,  संसारी गृहस्थाचे वर्तन कसं असावं याबद्दल भीष्मांनी लावलेले पाल्हाळ पाहता हे अगदी पटते.  तीच गोष्ट वनपर्वातील सत्यभामा-द्रौपदी संवादाची.  उत्तरकालीन पुरुषी प्रवृत्तीला स्त्री वर्गाकडून / पत्नी वर्गाकडून, अपेक्षित असणाऱ्या साऱ्या गोष्टी द्रौपदी द्वारे वदविल्या गेल्या आहेत, हे पटवून देण्यात जोतेगावकर यशस्वी होतात. 

तीच गोष्ट युधिष्ठिर यक्ष संवादाची.  ब्राह्मणी वर्चस्वाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी यक्ष युधिष्ठिर कडून वदवून घेतो व चक्क तळ्याकाठी मृत होऊन पडलेल्या पांडवांना जिवंत करतो.  भांडारकर संस्थेच्या श्री विष्णू सुखटणकर यांनी मांडलेल्या भृगू सिद्धांताचे हे आणखी एक उदाहरण. 

काही गोष्टींची उत्तरं जातेगावकर त्यांच्या प्रतीप्रश्नांनी आपल्या मनात तयार करतात.  भीष्म जिवंत असेपर्यंत शस्त्र हाती न धरण्याची करण्याची प्रतिज्ञा म्हणजे भीष्म मरणारच….  कौरवांचा पराभव होणारच….  याचे गृहीतक होते का?  “दर्जाने समान प्रतिस्पर्ध्यांशीच राजकुमार युद्ध करतात”  असे स्पर्धा प्रसंगी ठणकवणारे  कृपाचार्य, द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी गप्प का होते? सत्तेवरून कौरवांनी मध्ये ते शंभर असूनही दुही माजत नाही,  मात्र केवळ पाचच पांडवांना एकत्र ठेवायला एकाच द्रौपदीशी विवाह करावा लागतो, तो का ?  याच  द्रौपदीच्या विवाहाच्या वेळी व्यास येऊन द्रुपदाला, द्रौपदीच्या पूर्वजन्माची व शंकराच्या पाच पतीच्या वरांची गोष्ट का सांगतात? या सर्व गोष्टींचा उलगडा आपल्याला मनामध्ये होत राहतो. 

व्यास मात्र हे सर्व करून, कथानकात असून, स्वतः निर्विकार राहतात.  व्यासोत्तर काळात संपूर्ण संस्कृतीच कृष्णा च्या प्रेमात पडली व या अवतारवादाने महाभारतात हवी तशी भर घालून, त्याचं अगदी अंकोर वाटच्या मंदिरासारखं करून टाकले आहे.  त्याला जंगलानी  व वृक्षराजीने पूर्णपणे वेढून टाकले इतकं, की कधी कधी ते आतलं मंदिर ढळू नये म्हणून वाढलेल्या वृक्षांच्या शाखादेखील तोडता येत नाहीत, कारण तसं झालं तर, झाडांच्या मुळासह  मंदिराच्या ढाच्याला देखील धक्का लागू शकतो हि  जोतेगावकरांची हे समजावण्याची पद्धत पण अफलातून. 

पण हे असं असलं तरी हे पुस्तक वाचणं सोपं नाही.  महाभारतातले बरेचसे प्रसंग आरशात दाखवताना जातेगावकर गुढात  बोलतात.  अगदी या अंकोर वाटच्या मंदिरा सारख्या.  व म्हणूनच महाभारतातले बरेचसे प्रसंग यात सांगितले असले, तरी त्याचं मर्म समजायला आपल्याला ही गूढं सोडवावी लागतात व त्या पद्धतीत जातेगावकर व्यासांचा वारसा चालवीत आहेत असे मानता येते. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: